मानवतेचा अनोखा संदेश! फलटण तालुक्यातील दोन तरुणांकडून १५ दिवसांपासून बेवारस वासराचे संगोपन; श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी केले कौतुक!!

 

फलटण (प्रतिनिधी): 

माणुसकीचा जिवंत प्रत्यय देणारी आणि मन हेलावून टाकणारी एक अत्यंत सकारात्मक घटना गुरुवारी (६ ऑगस्ट) रात्री पिराचीवाडी ते ताथवडे दरम्यान घडली. ताथवडे गावातील दोन उच्चशिक्षित तरुणांनी दाखवलेल्या दयेचे आणि सामाजिक बांधिलकीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

नेमकी काय घडली घटना?

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर (बाळराजे) हे गुरुवारी रात्री पिराचीवाडीहून ताथवडेकडे जात असताना त्यांच्या गाडीसमोर गाईचे एक लहान वासरू आले. गाडी बाजूने पुढे निघून गेली, तरी माळरानावर या लहान जिवाचा जीव धोक्यात येईल या काळजीने बाळराजेंनी तात्काळ आपली गाडी मागे फिरवली. वासराला सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने ते परत आले असता, तिथे त्यांना माणुसकीचे अत्यंत सुंदर दृश्य पाहायला मिळाले.

१५ दिवसांपासून नित्यनेमाने सेवा!

ताथवडे येथील HDFC बँकेत कार्यरत असलेले श्री. सत्यवान शिंदे आणि श्री. ऋषिकेश शिंदे हे दोघे तरुण आधीच त्या ठिकाणी उपस्थित राहून वासराला पाणी, दूध आणि चारा भरवत होते. विशेष म्हणजे, आपली नोकरी आणि संसाराची जबाबदारी सांभाळून हे दोघे तरुण गेली १५ दिवस नित्यनेमाने दररोज या बेवारस वासराला दूध-पाणी पाजून त्याचे जतन करत आहेत.

बाळराजेंकडून कौतुक व मदतीचे आश्वासन!

या दोन्ही तरुणांची निष्काम सेवा आणि भूतदया पाहून श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांचे मन भरून आले. त्यांनी दोन्ही तरुणांच्या या कार्याचे मनापासून कौतुक केले आणि आभार मानले. तसेच, यापुढेही या मुक्या जिवाच्या संगोपनासाठी किंवा त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

धावपळीच्या आणि स्वार्थी जगात 'मानवतेचा एक हात असाही असतो' याचे मूर्तिमंत उदाहरण या घटनेने समाजासमोर ठेवले असून, शिंदे बंधूंच्या या संवेदनशीलतेचे संपूर्ण तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या