आम्ही प्रा. विठ्ठल कांगणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे - सुजात आंबेडकर


मुंबई,दि.३०- : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी प्रा. विठ्ठल कांगणे यांचे इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आल्याच्या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. “सरकारचा खरा चेहरा समोर आणणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.


स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रा. विठ्ठल कांगणे हे सोशल मीडियावर सरकारच्या धोरणांवर परखड मत व्यक्त करत होते. मात्र त्यांचे इंस्टाग्राम खाते अचानक बंद करण्यात आल्याने हा प्रकार संशयास्पद असल्याचे सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे.


कांगणे सरांनी भोंदू बाबा म्हणून चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणावर सरकारची पोलखोल करणारा व्हिडिओ तयार केला होता. याच पार्श्वभूमीवर त्यांचे अकाउंट बंद करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.



सुजात आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भाजप सरकारवर टीका करणारे, सुधारणा सुचवणारे आणि सत्य परिस्थिती मांडणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या शिक्षकाचे सोशल मीडिया खाते बंद करणे ही लोकशाहीसाठी धोकादायक बाब आहे.”


याआधी कॉमेडियन पुलकित मणी यांची रील हटवण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर सातत्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा आरोप केला.


दरम्यान, “सोशल मीडिया खाते बंद करून सरकार आपले अपयश लपवू शकत नाही. खरात प्रकरणात अडकलेल्या मोठ्या लोकांवर कारवाई करावी,” अशी मागणीही त्यांनी केली.


शेवटी, “सरकारच्या या हुकूमशाहीविरोधात आम्ही प्रा. विठ्ठल कांगणे सरांसोबत ठामपणे उभे आहोत,” असा इशाराही सुजात आंबेडकर यांनी दिला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या