[फलटण] शहर प्रतिनिधी: दि.26 मार्च 2026
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे पडसाद उमटत असून, भीम आर्मी संघटनेच्या वतीने या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. याबाबत भीम आर्मीने फलटणच्या उपविभागीय दंड अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भीम आर्मीचे फलटण तालुकाध्यक्ष अजित संभाजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक प्रक्रियेदरम्यान जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना अशा प्रकारे अपमानस्पद वागणूक मिळणे ही गंभीर बाब आहे. लोकशाहीत मंत्री महोदय आणि सामान्य जनता या दोघांनाही सन्मानपूर्वक वागणूक मिळणे आवश्यक आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
- पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की करणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई व्हावी.
- या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि पोलीस प्रशासनावर जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी शासनाने ठोस प्रयत्न करावेत.
यावेळी भीम आर्मीचे पदाधिकारी अजित मोरे, लक्ष्मण काकडे, सुनील पवार, तेजस भोसले, सनी पवार आणि तुषार जाधव यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन प्रशासनाला सोपवण्यात आले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, शासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज